अखेर कमाई - कवी कुसुमाग्रज
अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले
शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा
शिवाजीराजे म्हणाले
मी फ़क्त मराठ्यांचा,
आंबेडकर म्हणाले
मी फक्त बौद्धांचा,
टिळक उद्गारले
मी तर फक्त चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान
एकेक जात जमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!
- कुसुमाग्रज
Comments
Post a Comment